Tuesday, 16 June 2020

जेव्हा आई वडील निगेटिव्ह आलेत..

नमस्कार सगळ्यांना... 
माझ्या तमाम मित्र-मैत्रिणींनो, माझे हितचिंतक, माझी काळजी करणारे ते सगळे, तुमच्या सदिच्छानीं मी लवकरच बरी होईल यात तिळमात्र शंका नाही. आणि यातच एक आनंदाची बातमी😍 
माझ्या आई-पप्पांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. कोरोनाने गलत आदमी सें पगा लिया हैं। हे कोरोनाला समजल्यामुळे तो आपल्या आई- पप्पांपर्यंत पोहचला नाही याचा खूप खूप आनंद आहे. माझ्या आजीने माझा रिपोर्ट आल्यानंतर चीन आणि कोरोनाच्या 7 पिढ्यांचा उद्धार काढत कोरोनाला खूप शिव्या घातल्यात तो भाग वेगळा😁 

खरं तर आज, कालची संपूर्ण दिवसाची दगदग, धावपळ, आणि जगात भारी KDMC यावर लिहलेली पोस्ट आणि कोरोना झालेल्यांना काय झेलावं लागतं याविषयी लिहणार होते.. मात्र ही गुड न्युज मिळाली आणि माझा आनंद गगनात मावेनासा झाला... 
बाकी कोविड सेंटर हे बिगबॉस हाऊसप्रमाणे वाटतंय मला😊 सगळे अनोळखी लोकं, इथे प्रत्येकाला जिकायचं आहे.  मात्र कोणा दुसऱ्या- तिसऱ्या माणसाला हरवून नाही. तर इथे प्रत्येकाचा शत्रू एकच आहे "कोरोना" आणि माझ्यासारखे सगळेच वरच्या बिगबॉसने दिलेला हा टास्क पूर्ण करतायेत. टास्क पूर्ण होणार आणि आम्ही जिंकणार😎

बाकी मगाशीच हाऊसकीपिंगवाले काका म्हणाले 
" काय घाबरायचं या चिनी रोगाला ? डोळे मोठे करून  दाखव त्या कोरोना फोरोनाला😀 

क्रमशः
#कोरोना_डायरी

I am declared Covid Positive... 😌

I am declared Covid Positive... 😌
माझा रिपोर्ट दिनांक 9 जूनला पोजीटिव्ह आलाय. अर्थात माध्यमात काम करतेय म्हंटल्यावर 'बातमी देणारीच बातमी झाली होती' हे कळून चुकलं म्हणून स्वतः पोस्ट टाकली... 
अनेकांनी खरंच का? कुठे गेली होती? कल्याण की औरंगाबाद असे खूप प्रश्न विचारले. स्वाभाविक लोकं खूप प्रेम देतायेत काळजी करतायेत. मी मुळातच इतकी positive आहे मग कोरोना तरी Negative कसा येणार म्हणा... 
असो ! 
गेल्या 3 महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर होताच अविरत काम सुरुये. सगळं बंद होतं,  घरी जाणार तरी कशी? त्या सुपरफास्ट बातम्या, कोरोनाची अपडेटेड माहिती, घेऊयात आढावा, रुग्णांची आकडेवारी, इरफान खान, ऋषी कपूर यांचा मृत्यू... या सगळ्यात प्रेक्षक कंटाळू नये म्हणून 'सेलिब्रेटी क्वांराटाइन प्रोग्रॅम' असं बरंच काही केलं. धीर सुटतं होता "कारण" अनेक होती. मात्र दिवसरात्र झटणाऱ्या पोलिसांचा एक one to one  स्वतः स्पॉटवर जाऊन केला. त्याचे हाल पाहिले आणि पुन्हा कामाला लागली. हळूहळू ऑफिसमधील लोकं कमी होतं गेली. कामाचा ताण नसला तरी काम होतंच. घरी बसून मी पण कोरोना योद्धाची पोस्ट करणारी पुळचट पत्रकारिता मी नाही शिकली. म्हणूनचं की काय नॉनस्टॉप काम केलं. मात्र सोबत असणारे जिवाभावाचे सुद्धा निघून गेल्यानंतर, मेसचं ते अन्न सुद्धा नकोसं झालं. आई रोज रडायची फोनवर खड्यात गेलं सगळं घरी ये अमृता घरचं जेवण खा ! कुठे जात नाही नोकरी..😢 अखेर... आता मी जाते म्हणून वरिष्ठांची परवानगी घेतली आणि 5 जूनला कल्याणला निघाले. या अगोदर Medical fitness certificate  देखील घेतलं होतं ज्यावर आता मला शंका येतेय आणि म्हणून की काय दळभद्री कोरोना ही माझ्यासोबत कल्याणला आला. 5 जूनपासून आई-वडिलांच्या घरी न जाता त्यांच्यासमोर आमच्या दुसऱ्या घरी स्वतःला बंदिस्त करून घेतलं. खडकीतून समोरासमोर बोलणं आणि युज & थ्रोच्या ताटात जेवण घेणं ही वणवण रिपोर्ट येईपर्यंत सुरू होती. काल रिपोर्ट आला आणि मी ....हो मी घाबरले😢😢😢 माझ्यासाठी नाही तर माझ्या आई-पप्पांसाठी... ज्या मुलींची साडेचार महिने वाट पाहिली या कोरोनाकाळात ती आली 4 दिवस राहिली आणि मग पुन्हा हॉस्पिटल..... 
सुदैवाने आई पप्पा माझ्या संपर्कात आले नाहीत हे आमचं नशीब...
बाकी माझ्या नशिबाने मला पुन्हा एका खोलीत आणून पुढच्या 14 दिवसांसाठी बंद केलंय..

कोरोना टेस्ट - मनपा - रिपोर्ट - आणि कालचा पोजीटिव्ह आल्याचा पहिला दिवस यावर समाचार घेणे अजून बाकी...😊 
वेळ झालीये इथेच थांबण्याची वाचत राहा!  घरात राहा! काळजी घ्या ! मी पण घेतेच पर्याय नाही... 
क्रमशः 
#कोरोना_डायरी

Friday, 29 July 2016

माहिती व जनसंपर्क विभाग आणि मी


शिक्षण व्यवस्थेतील बदलासाठी इंटरनेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी सध्या विविध मोबाईल कंपन्याची चढाओढ लागली आहे… कोणी आयआयटीमध्ये जाण्यापेक्षा इंटरनेटच्या सहाय्यानेच आयुष्य कसे बदलेल याची आयडीया सुचवित आहे… तर कोणी इंटरनेटच्या सोबतीने पाहिजे ती गरज स्वत:च भागवू शकत असल्याचे सांगत आहे… या जाहिरातींनी शिक्षणात आता टेक्नॉलॉजीची आवश्यकता असल्याची गरज हेरली आहे… हे खरं आहे… पत्रकारितेची विद्यार्थी म्हणून या जाहिरातींचा अभ्यास करीत असतानाच आज मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनीही अशीच गरज अधोरेखील केली. 


माहिती व जनसंपर्क विभागात आतंरवासिता करीत असताना मला दररोज नवनवीन अनुभव येत आहेत… याच श्रृंखलेत आज थेट कुलगुरूंशी संवाद साधण्याची संधी मिळाली… ‘बदलत्या तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात भूमिका’ याविषयावर आधारित व्याख्यानातून शिक्षणतज्ज्ञ व कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दर्जेदार शिक्षणप्रणाली आपली प्रखर मत मांडून आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षणप्रणालीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी दिली… या कार्यक्रमाला संचालक अजय अंबेकर, संचालक (प्रशासन) देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती) शिवाजी मानकर यांच्यासह माहिती विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत आहे. पहिले काही हजारात मिळणाऱ्या शिक्षणाचा आकडा आता लाखोंचा घरात पोहोचला आहे… हे थांबविण्यासाठी सरकार आपल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. पण या समस्येचे उत्तर तंत्रज्ञानात आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शिक्षण प्रणालीत केल्यास चार भिंतींच्या आड मिळणारे ज्ञान ‘मुक्त’ होऊन ज्ञानगंगा घरोघरी पोहोचेल असा विश्वास डॉ. साळुंखे यांनी व्यक्त केला.

एक विद्यार्थी म्हणून यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुंचे तंत्रज्ञानाची लोकशिक्षणात मुख्य भूमिका आहे असे सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करता येऊ शकतो. ज्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांलाही फायदा होईल अशी खात्री पटली. डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना भुजबळ सरांनी सांगितले की, त्यांनी आजपर्यंत ४० विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी मार्गदर्शन केले आहे. सेंद्रीय रसायन शास्त्रात त्यांनी स्वत: पीएचडी केलेली हे ऐकूनच मी अवाक झाले. शिक्षण पद्धतीत काम करणारे लोक विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, नवे अभ्यासक्रम, कोर्सेस, देण्यासाठी झटत आहेत. इतका मोठा अनुभव असून सुद्धा आम्हा विद्यार्थ्यांशी त्यांनी मुक्तपणे संवाद साधला याचे अप्रुप वाटले.

एक विद्यार्थी म्हणून शिक्षण पद्धती विषयी माझ्या मनात अनेक प्रश्न होते ज्याची उत्तरे कुलगुरू साळुंखेनी सहज आणि सोप्पी करून सांगितली. आमच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या समृध्द संशोधनाची प्रचिती वेळोवेळी येत होती. विद्यार्थ्यांना भारतात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देत असताना त्यांनी विदेशातील शिक्षण क्षेत्रातील तंत्रप्रणाली देखील उलगडून सांगितली. शिक्षण ही लाईफ लाँग जर्नी आहे हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून समजावनू सांगितले. ज्ञानगंगा घरोघरी हे नाशिक विद्यापीठाचे ब्रीदवाक्य कशा प्रकारे सार्थ आहे, हे डॉ. साळुंखेंच्या अनुभवातुन मला समजले. व्याख्यानमालेच्या उत्तरार्धात आम्हा विद्यार्थ्यांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. या कार्यक्रमात माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ज्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा दिग्गज व्यक्तींकडून शिक्षण क्षेत्राविषयी येणाऱ्या नवीन तंत्रज्ञान, ॲप्स, कोर्सेसविषयी माहिती जाणून घेण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप आनंद आहे. माझ्या भावी आयुष्यात बदललेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग माझ्या शिक्षण प्रवासात होईल. एवढं मात्र नक्की.
-अमृता आनप
7208739705
amrutahanap23@gmail.com